चलो जम्मू .. !।
डोंबिवलीतील ‘हम ट्रस्ट’ कडून जम्मू आणि
आसपासच्या राजौरी, पुंछ येथील ‘विद्या भारती’
आणि ‘भारतीय शिक्षा समिती’ या संस्थांच्या मार्फत जे समजोपयोगी प्रकल्प चालविले
जातात त्या प्रकल्पांना भेट देण्यासाठी ७ ऑक्टोबर २०२३ ते १४ ऑक्टोबर २०२३ असा
दौरा आयोजित केला होता.. पावगीसाहेबांच्या सूचनेवरून मी या दौऱ्यात सहभागी झालो आणि एक अतिशय छान अनुभव माझ्या पोतडीत
जमा झाला, त्याचेच हे वर्णन ! आम्ही १६ जण होतो’
सकाळी १०.१५ च्या विमानाने दुपारी १ च्या
सुमारास जम्मूला पोहोचलो..तिथे कार्यरत असलेले संगीता आणि मनोज नशिराबादकर यांची
भेट झाली आणि त्यांनी आम्हाला .’भारतीय शिक्षा समितीशी संलग्न असलेल्या ‘सेवा
भारती’च्या कार्याची माहिती दिली.
वाघा बॉर्डर बहुतेक सर्वांना माहीत आहे पण
सुचेतगड सीमा फारशी माहीत नाही. सुचेतगड येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये
केवळ तारेचे कुंपण आहे अर्थात सीमा सुरक्षा चोकी आहेच आणि वाघा सीमेवर ज्याप्रमाणे
आपल्या जवानांचे संचालन होते त्याचप्रमाणे
येथेही अतिशय सुंदर संचालन होते, जवानांनी कमालीच्या कौशल्याने विविध प्रकार
दाखवले एवढेच नव्हे तर लष्करातील श्वान
पथकही तिथे होते आणि दोन श्वानांनी सुंदर कसरती केल्या. हे सगळे पाहणे हा अवर्णनीय
आनंद होता. जम्मूतील सुप्रसिद्ध रघुनाथ
मंदिर हे १८७३ मधील असून अतिशय देखणे आणि प्रचंड मोठे आहे. मंदिराच्या भिंतीवर
काश्मीरच्या इतिहासासंबंधी सखोल माहिती असलेले फलक आहेत.
जम्मू येथे सर्वात महत्त्वाची भेट म्हणजे
पंकजादीदी यांची. पकंजादीदी मूळच्या दक्षिण भारतातील पण फारच लहान वयात त्या
नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी झाल्या आणि समाजसेवेचे कंकण हाती
बांधून संघाच्या आदेशावरून जम्मूत काम
करण्यासाठी आल्या आणि अनेक मुलांच्या त्या आई झाल्या. दहशतवाद्यांच्या गोळीबारात
ज्यांचे पालक मारले गेले अशा अनेक मुलामुलींचे पालकत्व पंकजादीदी यांनी स्वीकारले
आहे. “ अदिती सेवा प्रतिष्ठान” ही त्यांची संस्था असून त्यामार्फत त्या हे उदात्त
कार्य करीत आहेत. त्या मुलांची केवळ राहण्याची व्यवस्था त्या करीत नाहीत तर
त्यांच्या शिक्षणाची व्यवस्थादेखील त्या बघतात. आम्ही गेलो तेव्हा तिथे बारा तेरा
जण होते आणि त्यात एम.ए. करणारी एक मुलगी
होती जिला लहानपणीच गोळी लागली होती. पायाभूत कार्य करणाऱ्या पंकजादीदी या एकट्याच
नाहीत तर आणखीनही बरेच जण आहेत.
जम्मूपासून १९ किलोमीटर दूर भारत
पाकिस्तान सीमेच्या आत पाच सात किलोमीटर
अंतरावर मुलींसाठी “दृष्टी” नावाचे वसतिगृह होते, ७ ते १७ वयोगटातील जवळपास १९ मुली
होत्या. या सर्व मुली जम्मूच्या आसपास राहणाऱ्याच पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल
कुटुंबातील होत्या. या वसतिगृहात त्या मुलींची शिक्षणासह व्यवस्था केली जाते. इथे कॉम्प्युटर रूम होती,
मुलींना खेळण्यासाठी आत आणि बाहेर साधने होती, झोपण्यासाठी बंक बेड होते, मुख्य
म्हणजे मोठ्या मुली लहान मुलींची काळजी घेतात. राजौरी येथेही अशा प्रकारचे मुलांचे
वसतिगृह होते . एका अतिशय चुणचुणीत मुलीने आम्हाला या वासतिगृहाची सर्व माहिती सांगितली.
एवढेच नव्हे तर प्रार्थनेची वेळ झाली तसे तिने अत्यंत नम्रपणे आपण आधी प्रार्थना करू
असे सांगितले आणि क्षणात सर्व मुली प्रार्थनेला जमल्या.
अतिरेक्यांची जास्त भीती आणि दहशत असलेला
भाग म्हणजे राजौरी आणि पूंछ, तिथल्या डंगरी
या गावातील एका शाळेला आम्ही भेट दिली. भारतीय शिक्षा
समितीमार्फत चालविली जाणारी ही शाळा सर्व साधनांनी युक्त आहे, प्रयोगशाळा, ग्रंथालय वगैरे सोयी आहेत; दहशत
आहेच, पण तरीदेखील शाळा निर्धाराने सुरू आहे. कौशल्य विकास शिकवले जाते.. इथल्या शिक्षकांना अत्यंत कमी पगार आहे
त्यामुळे शिक्षक मिळणे, दुर्गम प्रदेश या अडचणीतून निष्ठावान कार्यकर्ते शाळा
नेटाने चालवीत आहेत.
या शाळेनंतर दोन कुटुंबांना आम्ही भेटलो.
काही महिन्यांपूर्वी या दोन कुटुंबतील तीन तरुण मुलांना अतिरेक्यांनी समोरून
गोळ्या घालून मारले होते. हे ऐकताना डोळ्यात पाणी दाटले होते तर मनात संताप .. त्या कहाण्या
ऐकताना अंगावर काटा येत होता..
राजोरी येथे नतमस्तक व्हावे असे एक ठिकाण
म्हणजे बलिदान भवन! १९४७ सलो फाळणी
झाल्यावर या गावावर गुंडांनी हल्ला केला तेव्हा प्रतिकारात पुरुष मारले गेले आणि
त्यांच्या स्त्रियांनी गुंडांच्या हाती लागू नये म्हणून विहिरीत जीव दिला , त्याची
आठवण म्हणून इथे बलिदान स्तंभ उभारला आहे,
त्यावेळच्या दंगलीतील वाचलेली त्यावेळची एक मुलगी आता जवळपास ८५ वर्षांची आम्हाला भेटली. तिला अजूनही सर्व आठवते.
पूंछ येथील भारत पाकिस्तानी सीमारेषेवर
पोहोचलो. दोन किलोमीटर दूर थांबलो होतो. या सीमारेषेवरून दोन्ही देशात स्थानिक
मालाचा थोडाफार व्यापार चालतो. येणाऱ्या जाणाऱ्यांची तपासणी येथे झाल्यावर त्यांना प्रवेश दिला जातो. (
LOC TRADE CENTER) सीमारेषेपासून थोड्या अंतरावर आजोटे युद्ध स्मृतिस्थळ आहे.
अतिशय सुंदर बांधलेलें हे स्थळ स्फूर्तिदायक
आहे. आपली छाती अभिमानाने भरून येते.
तिथल्या मेघडंबरीत बसून आम्ही सावरकरांचे “जयोस्तुते “ हे मातृभूमीच्या स्तवनाचे उच्च रवात गायन केले. त्या स्थळावर उभारलेला भारतीय तिरंगा
पाकिस्तानातूनही दिसतो!
इथल्या “रिवर
व्यू” या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो होतो त्याचे संबंधित रवी शर्मा हे इथले
कार्यकर्ते आहेत. ते आमच्याबरोबर होते. त्यांचे बंधु सुधीर शर्मा यांनी आम्हाला “रोहित
शर्मा मेमोरियल ट्रस्ट” येथे नेले. ज्यांच्या नावाने हा ट्रस्ट स्थापन केला आहे ते
रोहित शर्मा हे अतिरेक्यांना कंठस्नान घालून हुतात्मा झाले होते. या ट्रस्टची
स्थापना श्री अली आणि त्यांची पत्नी शाहिस्ता तबस्सुम यांनी केली असून इथे पंतप्रधान
कौशल्य विकास योजना, शिलाई शिक्षण दिले जाते. श्री अली यांना या
कार्यासाठी अनेक वेळा धमक्या आल्या आहेत. तिथेच पुलित्स नदीच्या काठावर असलेल्या
एक सेंटरवर काही मुली शिलाई काम शिकत होत्या. ती शिलाई मशीन्स हम ट्रस्टनेच दिलेली
होती.
एक महत्त्वाचे
ठिकाण म्हणजे आखरोट येथील विस्थापित पंडितांची कॉलनी.! १९९० ला काश्मीरमधून
विस्थापित झालेल्या पंडितांसाठी ही कॉलनी उभारण्यात आली होती. आम्हाला त्या पंडितांपैकी काही जण भेटले, त्या कॉलनीच्या
हॉलमध्ये एक फिल्म दाखविण्यात आली जी “काश्मीर फाइल्स “ पेक्षाही करूण होती. ज्या पंडितांनी हे सर्व प्रत्यक्ष भोगले
ती माणसे आमच्या आसपास होती. त्यांची घरे
त्यांच्या डोळ्यादेखत जाळली गेली, अत्याचार
केले गेले ; ते सर्व त्या फिल्ममध्ये होते ते पाहताना अंगावर शहारे येतात.
बाकी जम्मू आणि
आसपासची बरीच मंदिरे रामेश्वर मंदिर, कृष्ण मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर,मार्गात
लागलेली दोन सुंदर प्राचीन शंकर मंदिरे,
बुढा अमरनाथ, नवग्रह मंदिर असे सर्व [याहून तिथला सुंदर निसर्ग आणि मनाला चटका लावणारे
वास्तव अनुभवले.
डोंबिवलीतील मनोज
आणि संगीत नशिराबादकर दाम्पत्य मागील काही वर्षे तिथे कार्यरत आहे. जम्मू काश्मीरला
भेट देणाऱ्या मंडळींनी विद्या भारती आणि भारतीय शिक्षा समिति यांनी चालविलेल्या कार्यासही
आवर्जून भेट द्यावी.
. .