Saturday, April 9, 2022

 

वाढदिवस --!

अलीकडे वाढदिवस साजरा करणे म्हणजे एक इव्हेंट झाला आहे. वाढदिवस, मग तो जन्माचा

म्हणजे वय वाढल्याचा असो, लग्नाचा असो, नोकरीला लागल्याचा दिवस असो किंवा कोणताही

असो तो साजरा करण्याकडे कल आहे/असतो.

वाढदिवस साजरा करण्याच्या काही पद्धती आता रूढ झाल्या आहेत. एक भला मोठा केक

आणायचा ( त्याची किमत जेवढी जास्त तेवढे आपले प्रेस्टीज जास्त!), मग मध्यभागी एक टेबलावर

ठेवून त्यावर मेणबत्ती ठेवायची, मेणबत्ती पेटवून मग ज्याचा वाढदिवस असेल तो टेबलाजवळ उभा

राहिला की सर्वांनी गोळा व्हायचे, जल्लोष करायचा, मोठ्या आवाजात गाणी लावायची मग फुंकर मारून मेणबत्ती विझवायची, कसले तरी फवारे उडवायचे आणि मग, पित्झा, बर्गर, पास्ता असे पदार्थ

खायला द्यायचे. मुख्य म्हणजे जमणाऱ्या माणसांनी/मुलांनी भेट वस्तू /गिफ्ट द्यायच्या आणि परत भेट

रिटर्न गिफ्ट घ्यायच्या. (कधी, काही ठिकाणी मद्यदेखील दिले जाते )शाळेत वर्गातील मित्र, मैत्रिणींना महाग चॉकलेट वाटायची इ . इ .

या सर्व इव्हेंटमध्ये निश्चितच काही हजार रुपये उडतात.

या सर्व प्रकारची काही आवश्यकता आहे का, हा प्रश्न माझ्या मनात येतो याचे कारण असे की, माझ्या ओळखीचे एक गृहस्थ म्हणाले की, वाढदिवस त्यांच्या मुलाचा किंवा मुलगी म्हणा साजरा करायचा आहे

आणि एवढे पैसे कुठून आणायचे? कारण दोनच महिन्यांपूर्वी अन्य कोणाकडे ते गेले होते तर त्यांनी किती खर्च कला होता, महाग  रिटर्न  गिफ्ट दिल्या होत्या आणि आता जर आम्ही त्यापेक्षा कमी काही दिले तर लगेच चर्चा होणार आणि घरातून हट्ट तर असा आहे की सोसायटीत राहायचे आहे तर खर्च

करायलाच हवा. म्हणजे मग या वाढदिवस साजरा करण्यात व्यवहार आला नि आनंद नाहीसा झाला . कोणाला तरी दाखविण्यासाठी, इंप्रेशन मारण्यासाठी, बरोबरी करण्यासाठी वाढदिवस आणि तत्सम इव्हेंट करायचे. परवडत नसताना, खोट्या प्रतिष्ठेसाठी ही सगळे करायचे.

आनंद वगैरे साजरा करणे ही ठीक आहे, पण  कोणत्या मर्यादेपर्यंत? आपण जर कोणती लहान वस्तू किंवा स्वस्त वस्तू दिली तर लोक आपल्याला हसतील, मागच्या वर्षी आपण त्यांना काय दिले होते आणि आता ते आपल्याला काय देतात या प्रकारच्या चर्चा नंतर होतातच! बरे महाग वस्तू भेट द्यायची इच्छा नसेल, परवडत नसेल तर इव्हेंटला नाही गेलो तरी चर्चा होणार! अगदी फेसबुक आणि व्हाटस आप वर जरी

कोणी शुभेच्छा दिल्या नाहीत तरी चर्चा होते. मग आपल्या समूहावर एखाद्याने शुभेच्छा दिल्या की आपण मागे राह्यला नको म्हणून पटकन एखादे चित्र टाकून मोकळे व्हायचे आणि तोंडदेखलेपणा केला जातो.       

 मला वाटते की आता या पद्धती बदलायला हव्यात. मी अजिबात संस्कृति रक्षण वगैरेच्या गोष्टी सांगत नाही. वरील सर्व गोष्टींची खरेच काही आवश्यकता आहे का याचा विचार व्हायला हवा. वाढदिवस असला की घरच्या घरी औक्षण करावे, घरीच बनविलेले किंवा फार फार तर दुकानातून आणलेली मिठाई किंवा पेढे अशाप्रकारचे गोड पदार्थ वाटावेत आणि त्यातूनही जर तुम्हाला  खरोखरीच खर्च करायची इच्छा असली तर अनाथाश्रम, सार्वजनिक आरोग्यासाठी मदत किंवा सरकारी मदत निधी

अशा ठिकाणी पैसे, कपडे, औषधे वाटावेत.             

मी एक विचार मांडला आहे. कोणाला पटेल नाही पटेल पान आमच्या घरी आम्ही अशा प्रकारे वाढदिवस साजरे करतो .