आपल्याला नोंदी : अहमेदनगऱ् १
अहमदनगर या शहराशी माझा तसा कधी संबंध आला
नव्हता. तो आला ‘कांकरिया कार्डक’ या
बालनाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या
संस्थेमुळे. या संस्थेने नुकतीच २५ वर्षे पूर्ण केली आणि त्या निमित्ताने त्यांना
एक स्मरणिका प्रकाशित करावयाची होती आणि त्या स्मरणिकेच्या संपादनात साहाय्य आणि
मुद्रित शोधन करावे अशी विनंती माझे नगरकर
मित्र जयंत एलुलकर यांनी केली आणि या निमित्ताने माझा नगरशी संबंध आला.
काना, मात्रा, वेलांटी नसलेले गाव अशी
नगारची एक ओळख आहे. तसेही ते गाव अत्यंत
रुक्ष आहे असा माझा समज होता. प्रा. मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापुरकर असे
नाट्यकर्मी या गावाचे आहेत अशी ,माहिती होती.
‘रं ग मं च’ या स्मरणिकेचे काम करताना,
त्यातील लेख वाचताना लक्षात आले की, कांकरिया करडकाचे डॉ. प्रकाश कांकरिया आणि डॉ.
सुधा कांकरिया यांनी फार मोठे काम केले आहे. मागील पंचवीस वर्षे बालनाट्य स्पर्धा
आयोजित करणे, तेही कोणाकडून आर्थिक साहाय्य न घेता ही खरोखरीच रंगभूमीची सेवाच
म्हटली पाहिजे. मागील पंचवीस वर्षात निदान काही हजार कलाकार या रंगमंचावर येऊन
गेले आहेत; आणि आज त्यातील अनेक जण विविध मालिकांतून तसेच हिंदी, मराठी
चित्रपटांतून तसेच ओटीटी पटलावर, काही दिग्दर्शक म्हणून काही तंत्रज्ञ म्हणून आपल्या कलेचे दर्शन घडवित आहेत. कांकरिया
करंडकाच्या रंगमंचावर जी लहान पावले पडली त्यांचा मोठा ठसा पुढे कलक्षेत्रावर
उमटला त्याचे सर्व श्रेय कांकरिया या
कलासक्त दाम्पत्याला जाते. स्मरणिकेतील लेखातून
नगरच्या अनेक कलाकारांचा परिचय होतो. तसेच
प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा, दिग्दर्शन, संहिता, सादरीकरण या अंगाने आणि एकूणच
बालनाट्य चळवळीची, त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील बालनाट्य चळवळीचे अध्वर्यू
रत्नाकर मतकरी, सुद्धा करमरकर, ग्रीप्स चळवळ अशी अनेक प्रकारची माहिती मिळते
त्यामुळे ही स्मरणिका, संस्मऱणिका झाली आहे असेच म्हणावे लागेल. बालनाट्य चळवळीची
विविधांगी माहिती आणि महाराष्ट्रातील बालनाट्य शिबिरे आणि स्पर्धा घेणाऱ्या
संस्थांची सूची असल्यामुले या संस्मऱणिकेला एका संदर्भ ग्रंथाचे स्वरूप आले असून
ऐतिहासिक दस्तऐवज म्हणूनही उल्लेख करता येईल.
महत्त्वाचे म्हणजे रौप्य महोत्सवाच्या
निमित्ताने कांकरिया दांपत्याने शहरातील १०१ कलाकारांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन
केला आणि त्यांच्या प्रती समाजाला वाटणारी कृतज्ञता व्यक्त केली.
स्मरणिकेचे प्रकाशन ७ मे रोजी नगरच्याच
माउली हॉलमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ कवी श्री फ. मु शिंदे यांच्या हस्ते झाले.
डॉ. सुधा कांकरिया या स्वत: नृत्यांगना आहेत. सलग बारा
तास शास्त्रीय नृत्य करण्याचा विकर्म त्यांच्या नावावर आहे. डॉ. प्रकाश आणि डॉ.
सुधा हे दोघेही नेत्रतज्ज्ञ आहेत आणि
त्यांचा मुलगा आणि सूनही नेत्रतज्ज्ञ आहेत. आपल्या व्यवसायास अनुसरून ही मंडळी
विनामूल्य शिबिरे आयोजित करतात. नगरसारख्या काहीशा रुक्ष वातावरण असलेल्या शहरात
कांकरिया दांपत्याने कलेचे नंदनवन फुलविले आहे असेच म्हणावे लागेल.
आणि खरोखरीच अहमदनगरमध्ये कांकरिया
दांपत्याने ‘साई बन’ येथे १०० एकर जमिनीवर नंदनवन उभे केले आहे. नगरच्या बाहेर १००
एकर जमीन १९९२ साली घेऊन, जिथे शब्दश:
माळरान होते ,
गवताचे पातेही नव्हते तेथे डॉ. प्रकाश
यांनी औद्योगिक क्षेत्रातील सांडपण्यावर प्रक्रिया करून, सर्व जमिनीची यथायोग्य
मशागत करून तेथे आज दाट झाडी असलेले जंगल, एक विस्तीर्ण तळे, त्यात नौका विहाराची
सोय, झिपलाइन, ध्यानगृह, सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याच्या जागा, कठपुतळीचा खेळ
असे अनेक उपक्रम आहेत. या सर्व उपक्रमाचे म्हणजे शुष्क माळरान ते आजचे ‘साई बन’ येथपर्यंतच
प्रवास दर्शविणारी फोटो गॅलरीही तिथे आहे. मुख्य म्हणजे अतिशय सुंदर आणि उत्तम
ध्वनि व्यवस्था असलेले देखणे अॅम्फी थिएटर आहे. आजूबाजूला पसरलेल्या निसर्गरम्य
वातावरणात कोणत्याही कलाकाराला, कलावंताला इथे कार्यक्रम करायची इच्छा होईल. ८ मे
२०२३ या दिवशी डॉ. प्रकाश आणि डॉ. सुधा यांनी, रौप्य महोत्सवाच्या आयोजनात सहभागी
असलेल्या सर्वांच्या सन्मान साई बन येथेच केला आणि त्यानंतर स्वादिष्ट भोजनाचा
रुचकर अनुभव, म्हणजे आईस्क्रीमवर विराजमान झालेली चेरीच! आवर्जून अनुभव घ्यावा असे
हे साई बन आहे.
कांकरिया दांपत्याच्या कला आणि
नाट्यप्रेमामुळे हे सर्व घडून आले आणि जयंत येलुलकर यांनी हे घडवून आणले त्यांचे आभार