Saturday, August 5, 2023

 नोंदी: अहमदनगर २

कांकरिया करंडकाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने अहमदनगर जाणे झाले. अहमदनगर येथे माझी आते बहीण डॉ. लीला गोविलकर राहतात. माझे पुण्यात अनेकदा जाणे झाले /होते पण पुण्यापासून जवळ असलेल्या नगरला जाणे झाले नाही आणि त्यामुळे डॉ. लीला गोविलकर यांची भेट कित्येक वर्षांत झाली नाही. आता कांकरिया करंडकाच्या निमित्ताने जातोय तर त्यांची भेट घ्यायचीच असं म्हणत त्यांना फोन केला आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनीही अतिशय प्रेमाने त्यांच्याच बंगल्यात मुक्कामास  यायला सांगितले.

डॉ. लीला गोविलकर, वय वर्षे फक्त ८५ , ( म्हणून मी ‘अहो जाहो’ असा उल्लेख करतो )असूनही शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या तेज, तल्लख ! त्याचाच अनुभव इथे मांडण्याचा प्रयत्न.

सकाळी त्यांच्या बंगल्यात पहिल्या मजल्यावर असलेल्या गोलाकार बाल्कनीत लीलाताईंशी गप्पा रंगल्या. आधी मुंबईत आणि नंतर अहमदनगरला अध्यापनाचे  काम करणाऱ्या लीलाताईंना  स. ग. मालशे, अ. का. प्रियोळकर यांच्यासारख्या गुरूंचे मार्गदर्शन लाभलेले. भाषा विज्ञान या विषयात त्यांनी डॉक्टरेट जरी केली असली तरी त्यांना सगळ्याच विषयात रस होता. त्यांच्या टेबलावर एकाच वेळेस तीन पुस्तकांची कामे पडलेली होती. लिहून झालेले बरेचसे फूलस्केप तिथे होते. लीलाताईंचे ‘ज्ञानेश्वरीचे वाङमयीन वैभव हे पुस्तक मी वाचले होते. तो धागा मनात ठेवून मी त्यांना म्हटले की “ ज्ञानेश्वरीवर मुकुंदराजांच्या विवेकसिंधुचा  काही अंशी परिणाम आहे असे तुम्ही म्हणता, यात ज्ञानेश्वरांना गौणत्व येत नाही का?” त्या म्हणाल्या “ नाही, तसे होत नाही, विवेकसिंधु आणि ज्ञानेश्वरीतील काही ओव्या यात निश्चितच साम्य आहे पण अभिव्यक्तीत फरक आहे , आणि तसेही मुकुंदराज आणि ज्ञानेश्वर यांच्यात जवळपास १०० वर्षांचे अंतर आहे, या दीर्घ काळात भाषेच्या सर्वच स्वरूपात आमूलाग्र बदल होतो “ आणखीन महत्त्वाचे विधान त्यांनी केले की अनेक साहित्यिक असो, धार्मिक असो, अशा साहित्यकृतीत लोकसाहित्याचा अंश असतोच! श्रवणीयता हा मौखिक साहित्याचा लक्षणीय गुण आहे.” अशा प्रकारे सुरू झालेली ही बौद्धिक चर्चा, अनेक वळणे घेत अनेक तास चालू होती. नामदेव हे खरे सर्वसामान्यांचे संत, ज्ञानेश्वरांच्या  समकालीन असलेले नामदेव, त्यांच्याकडे ज्ञानेश्वरांनी पुढारीपण देऊन टाकले. ज्ञानेश्वर हे काहीसे वरिष्ठ वर्गाशी जोडलेले तर नामदेव यांची सर्व सामान्य लोकांशी नाळ जुळलेली. शिवाय नामदेव हे संसारी होते, तुकाराम संसारी होते, संसारात राहून परमार्थ करता येतो, महदंबा, मुक्ताई , जनाबाई, चोखामेळा, कान्होपात्रा, रामदास अशी चर्चेची रंगत वाढत ती खांडेकर, फडके, जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन हा वाद; तसेच आर्य हे भरतीयच होते, भारताच्या बाहेरून आलेले नाही, इंडो आर्यन भाषा, भाषेचे संक्रमण, अवेस्ता आणि ऋग्वेद यांच्या भाषेतील साम्य, एका विष्यवारून दुसरा विषय असे कितीतरी  थांबे घेत घेत मी दीड दिवस यथेच्छ बौद्धिक आनंद घेतला.

आपल्या मताविषयी लीलाताई ठाम असतात. एक दोनदा मी थोडेसे वेगळे बोलताच  त्यांनी त्यातील वैचारिक फरक उलगडून दाखविला. सध्या त्यांच्या हातातील तिन्ही प्रकल्प त्यांना वेळेच्या मर्यादेत पूर्ण करायचे होते. त्याविषयी त्यांनी माहिती सांगितली.

त्यांच्याशी बोलताना मला सारखी दुर्गाबाईंची  आठवण येत होती. त्याही बोलण्यात ठाम असत, एक वैचारिक, बौद्धिक करारीपणा त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्या बोलत असताना जाणवत असे, तोच अनुभव मला लीलाताईंशी बोलताना आला.

“बौद्धिक चर्चेने पोट काही भरत नाही तेव्हा आता जेवायला चला” अशी प्रेमळ सूचना माझ्या सौने आणि पुतणीने  केली तेव्हा आम्ही उठलो. आणि पुन्हा जेवताना तास दीड तास गप्पा रंगल्याच.

त्यांचा निरोप घेऊन निघताना असे वाटले की हा ज्ञानाचा खजिना, स्त्रोत माझ्या इतक्या जवळ असताना मागील अनेक वर्षांत त्यांची माझी भेट झाली नाही. जवळपास २५/३० वर्षांपूर्वी ‘वर्णनात्मक भाषाविज्ञान’

या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन आमच्या आरती प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले होते. त्यानंतर आताची ही भेट  ! खूप काही राहिले असल्याची खंत जाणवणारी आणि बरेच काही मिळाले याचे समाधान देणारी.!

निघताना त्यांनी मला त्यांची २०२१ आणि २०२२ मध्ये प्रकाशित झालेली दोन पुस्तके “जावे संतांच्या गावा’ आणि “संत नामदेव ::अंतरंग दर्शन” ही भेट म्हणून दिली. 

एका उत्तम भेटीची उत्कट आठवण घेऊन आम्ही परतलो.

सुरेश देशपांडे / डोंबिवली                                   

   नोंदी: अहमदनगर २

कांकरिया करंडकाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने अहमदनगर जाणे झाले. अहमदनगर येथे माझी आते बहीण डॉ. लीला गोविलकर राहतात. माझे पुण्यात अनेकदा जाणे झाले /होते पण पुण्यापासून जवळ असलेल्या नगरला जाणे झाले नाही आणि त्यामुळे डॉ. लीला गोविलकर यांची भेट कित्येक वर्षांत झाली नाही. आता कांकरिया करंडकाच्या निमित्ताने जातोय तर त्यांची भेट घ्यायचीच असं म्हणत त्यांना फोन केला आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनीही अतिशय प्रेमाने त्यांच्याच बंगल्यात मुक्कामास  यायला सांगितले.

डॉ. लीला गोविलकर, वय वर्षे फक्त ८५ , ( म्हणून मी ‘अहो जाहो’ असा उल्लेख करतो )असूनही शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या तेज, तल्लख ! त्याचाच अनुभव इथे मांडण्याचा प्रयत्न.

सकाळी त्यांच्या बंगल्यात पहिल्या मजल्यावर असलेल्या गोलाकार बाल्कनीत लीलाताईंशी गप्पा रंगल्या. आधी मुंबईत आणि नंतर अहमदनगरला अध्यापनाचे  काम करणाऱ्या लीलाताईंना  स. ग. मालशे, अ. का. प्रियोळकर यांच्यासारख्या गुरूंचे मार्गदर्शन लाभलेले. भाषा विज्ञान या विषयात त्यांनी डॉक्टरेट जरी केली असली तरी त्यांना सगळ्याच विषयात रस होता. त्यांच्या टेबलावर एकाच वेळेस तीन पुस्तकांची कामे पडलेली होती. लिहून झालेले बरेचसे फूलस्केप तिथे होते. लीलाताईंचे ‘ज्ञानेश्वरीचे वाङमयीन वैभव हे पुस्तक मी वाचले होते. तो धागा मनात ठेवून मी त्यांना म्हटले की “ ज्ञानेश्वरीवर मुकुंदराजांच्या विवेकसिंधुचा  काही अंशी परिणाम आहे असे तुम्ही म्हणता, यात ज्ञानेश्वरांना गौणत्व येत नाही का?” त्या म्हणाल्या “ नाही, तसे होत नाही, विवेकसिंधु आणि ज्ञानेश्वरीतील काही ओव्या यात निश्चितच साम्य आहे पण अभिव्यक्तीत फरक आहे , आणि तसेही मुकुंदराज आणि ज्ञानेश्वर यांच्यात जवळपास १०० वर्षांचे अंतर आहे, या दीर्घ काळात भाषेच्या सर्वच स्वरूपात आमूलाग्र बदल होतो “ आणखीन महत्त्वाचे विधान त्यांनी केले की अनेक साहित्यिक असो, धार्मिक असो, अशा साहित्यकृतीत लोकसाहित्याचा अंश असतोच! श्रवणीयता हा मौखिक साहित्याचा लक्षणीय गुण आहे.” अशा प्रकारे सुरू झालेली ही बौद्धिक चर्चा, अनेक वळणे घेत अनेक तास चालू होती. नामदेव हे खरे सर्वसामान्यांचे संत, ज्ञानेश्वरांच्या  समकालीन असलेले नामदेव, त्यांच्याकडे ज्ञानेश्वरांनी पुढारीपण देऊन टाकले. ज्ञानेश्वर हे काहीसे वरिष्ठ वर्गाशी जोडलेले तर नामदेव यांची सर्व सामान्य लोकांशी नाळ जुळलेली. शिवाय नामदेव हे संसारी होते, तुकाराम संसारी होते, संसारात राहून परमार्थ करता येतो, महदंबा, मुक्ताई , जनाबाई, चोखामेळा, कान्होपात्रा, रामदास अशी चर्चेची रंगत वाढत ती खांडेकर, फडके, जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन हा वाद; तसेच आर्य हे भरतीयच होते, भारताच्या बाहेरून आलेले नाही, इंडो आर्यन भाषा, भाषेचे संक्रमण, अवेस्ता आणि ऋग्वेद यांच्या भाषेतील साम्य, एका विष्यवारून दुसरा विषय असे कितीतरी  थांबे घेत घेत मी दीड दिवस यथेच्छ बौद्धिक आनंद घेतला.

आपल्या मताविषयी लीलाताई ठाम असतात. एक दोनदा मी थोडेसे वेगळे बोलताच  त्यांनी त्यातील वैचारिक फरक उलगडून दाखविला. सध्या त्यांच्या हातातील तिन्ही प्रकल्प त्यांना वेळेच्या मर्यादेत पूर्ण करायचे होते. त्याविषयी त्यांनी माहिती सांगितली.

त्यांच्याशी बोलताना मला सारखी दुर्गाबाईंची  आठवण येत होती. त्याही बोलण्यात ठाम असत, एक वैचारिक, बौद्धिक करारीपणा त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्या बोलत असताना जाणवत असे, तोच अनुभव मला लीलाताईंशी बोलताना आला.

“बौद्धिक चर्चेने पोट काही भरत नाही तेव्हा आता जेवायला चला” अशी प्रेमळ सूचना माझ्या सौने आणि पुतणीने  केली तेव्हा आम्ही उठलो. आणि पुन्हा जेवताना तास दीड तास गप्पा रंगल्याच.

त्यांचा निरोप घेऊन निघताना असे वाटले की हा ज्ञानाचा खजिना, स्त्रोत माझ्या इतक्या जवळ असताना मागील अनेक वर्षांत त्यांची माझी भेट झाली नाही. जवळपास २५/३० वर्षांपूर्वी ‘वर्णनात्मक भाषाविज्ञान’

या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन आमच्या आरती प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले होते. त्यानंतर आताची ही भेट  ! खूप काही राहिले असल्याची खंत जाणवणारी आणि बरेच काही मिळाले याचे समाधान देणारी.!

निघताना त्यांनी मला त्यांची २०२१ आणि २०२२ मध्ये प्रकाशित झालेली दोन पुस्तके “जावे संतांच्या गावा’ आणि “संत नामदेव ::अंतरंग दर्शन” ही भेट म्हणून दिली. 

एका उत्तम भेटीची उत्कट आठवण घेऊन आम्ही परतलो.

सुरेश देशपांडे / डोंबिवली                                   

    

No comments:

Post a Comment