Tuesday, June 9, 2020

एका कवीची भेट...!

१९७२/७३ ची गोष्ट असेल. त्यावेळेस डोंबिवली किती लहान होती! आधुनिक जीवनपद्धतीचा स्पर्श अजून व्हायचा होता. साधी माणसे, साधी राहणी, आर्थिक मान तसे बेताचेच पण गाव मनाने श्रीमंत! कोणाच्याही घरी जर एखादा चांगला कार्यक्रम, म्हणजेशास्त्रीय संगीताची मैफल म्हणा किंवा काव्यवाचनाचा तर आपण ओळखदेख नसताना देखील जाऊ शकत होतो, त्यात ना जाणाऱ्याला कमीपणा वाटत असे ना यजमानाला ओझे वाटत असे.

अशाच एका संध्याकाळी मला कळले की सरखोतांच्या घरी साक्षात बाकीबाब बोरकर, पुरुषोत्तम पाटील आणि वा.रा.सोनार येणार आहेत आणि रात्री त्यांचे काव्यवाचन होणार आहे. अशी संधी नेहेमी येत नाही हो, मोठ्या उत्साहाने मी त्या कार्यक्रमाला गेलो आणि आयुष्यभर लक्षात राहील असा तो कार्यक्रम अनुभवला!  

बोरकर नेहेमीच्याच उत्साहाने, आपल्या अनुनासिक स्वरात कविता म्हणत होते, अगदी

“माझ्या गोव्याच्या भूमीत...” पासून ते “सरीवर सारी आल्या गं, गोपी सचैल न्हाल्या गं” इथपर्यंत! हे लिहिताना आजदेखील माझ्या अंगावर काटा येतो! त्यांचा आवाज कानात घुमायला लागतो!

बोरकरांनंतर अमळनेरच्या वा. रा. सोनार यांनी कविता म्हटल्या, त्याही कविता छानच होत्या; त्यातील (बहुधा) ‘खिडकी नावाची कविता मला आठवतेय.

पण मला सांगायची आठवण आहे ती पुरुषोत्तम पाटील यांची.

त्यांनीही त्यांच्या काही रचना सादर केल्या, त्यातील एक कविता, आता त्या कवितेचे शब्द माझ्या लक्षात नाहीत पण आशय मात्र लक्षात आहे, त्या कवितेत पुरुषोत्तम पाटील

असं म्हणतात: कोकणातल्या एका सुंदरशा खेडेगावातील एक तरुणी जिने नुकतेच तारुण्यात

पदार्पण केले आहे अशी, पहाटेच्या वेळी आपल्या चंद्रमौळी घरामागील न्हाणीघरात आंघोळ करतेय. आता ते न्हाणीघर म्हणजे केळीचे खांब लावून आडोसा उभा केलेला! अशा त्या न्हाणीघरात आंघोळीला गेलेल्या त्या तरुणीला स्पर्श करण्यासाठी सूर्याच्या किरणांची लगबग सुरु असते आणि या इथे पुरुषोत्तम पाटील यांच्यातील कवी असं म्हणतो

“त्या दिवसापासून सूर्यकिरणांच्या रंगात भांडणे सुरु झाली म्हणतात!” या शेवटच्या ओळीने कविता एकदम उंचीवर पोचली! आणि त्या ओळीचा अर्थ लक्षात यायला काही क्षण लागले आणि मग टाळ्यांच्या कडकडाटाचा  उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला!

ही कविता, हा आशय माझ्या अजूनही लक्षात आहे, आणि या कवितेमुळे पुरुषोत्तम पाटील हे नावही लक्षात राहिले.

पुढे जवळपास २५/२६ वर्षांनी पुरुषोत्तम पाटील पुण्याला एक पुस्तकांच्या दुकानात भेटले.

अर्थात  मी त्यांना ओळखले नाही पण दुकानाच्या मालकांनी त्यांची ओळख करून दिली.

पुरुषोत्तम पाटील म्हटल्यावर मी चटकन उभा राहिलो, त्यांना नमस्कार केला आणि त्यांनाच वरील कविता अनेक वर्षांपूर्वी ऐकल्याचे सांगितले आणि ती कविता अजूनही लक्षात आहे असं सांगितल्यावर त्यांना खूप आनंद झाला. एका रसिकाने आपल्या साहित्याची आठवण अनेक वर्षे आपल्या मनाशी जपून ठेवावी यातच त्या साहित्यकृतीचे यश तर आहेच पण ती साहित्यकृती निर्माण करणाऱ्याचेही यश आहे!

अशा रसिकांच्यासाठीच तर साहित्यकृती निर्माण होत असतात!

सुरेश देशपांडे   

     

     

 

 

 

 

                  

 


No comments:

Post a Comment