Monday, June 14, 2021

 

मोर आणि रावा .....!

आजच्या अत्यंत नीरस आणि रुक्ष बनलेल्या आपल्या आयुष्यात अवचितपणे एखाद्या दिवसाचे

दिवसाचे असे अनोखे दान पदरात पडते की केवळ आपणच नव्हे तर आपल्या आजूबाजूचा परिसर

आनंद आणि उत्साहाने भरून जावा! अचानक नजरेला पडणारे सुरेख दृश्य, काळजाला भिडणारे सुरेल

स्वरातील गाणं, मनात रेंगाळणारी कविता किंवा लक्षात राहील असा सुंदर लेख असं काही पाहिलं,

ऐकलं वाचलं की वाटतं जीवन काही अगदीच रुक्ष नाही!

बऱ्याच वर्षांपूर्वी ‘मोर यावा रे’ हा ललित लेख वाचला होता नि तो लेख, त्या लेखातील,पिसारा फुलवून थुईथुई नाचणारा मोर अजूनही मनात ताजा आहे. बाल्कनीएवढं आकाश लाभलेल्या आमच्या घरातून सूर्य,चंद्र नि तारे यांचेही दर्शन घडू शकत नाही! अशा वेळेस मनात रेंगाळणारा मोर मनाला भुरळ घालतो, चित्त पालवतो पण समजा असं मोहक निसर्ग लेणं जर खरोखरीच दारी अवतरलं तर.....?

परवाचा दिवस अगदीच वेगळा होता! तिसऱ्या मजल्यावरच्या आमच्या बाल्कनीपर्यंत झाडे वाढली आहेत. गुलमोहोरही त्यात आहे. मध्यंतरी अगदीच पर्णहीन झालेल्या त्याच्या फांद्या म्हणजे दरिद्री नारायणाच्या देहाच्या बरगड्याच! पण कालांतराने त्याला पालवी फुटू लागली नि आता त्यांच्या टोकाटोकाला फुटणारी इवलीइवली हिरवी पानं नवजात अर्भकाच्या टाळूवरील लवेसारखी मऊशार

दिसतात. हे गुलमोहोराचं झाड जसा माझ्या दृष्टीचा विसावा तसच पक्ष्यांच्या बागडण्याचा निवारा! रोज साधारणपणे पहाटे पाच साडेपाचनंतर सुमारास चिवचिव कानावर पडायला लागते नि मनात ते तो नाद घुमत असताना हळूहळू चिवचिवाट वाढत जातो.

सहा साडेसहाच्या सुमारास बाल्कनीच्या कठड्यावर कोपरे टेकवून नि हाताच्या ओंजळीत हनुवटी टेकवून झाडांच्या हिरव्या पानात चिवचिवत बसलेल्या चिमण्यांकडे पाहत मी उभा असतो. मंदगारशा हवेत नि उजळत जाणाऱ्या दिशांत लक्षात येतं की या चिमण्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, प्रचंड जीवनोत्साह त्यांच्यात भरला आहे. मधूनमधून फांदीवर चोची घासून धार काढीत, मध्येच चोच आपल्या छातीशी आतल्या बाजूस वळवून तर कधी डावी उजवीकडच्या पंखात खुपसून त्यांचं अंग स्वच्छ करणं चालू असतं. जोडीला अखंड चिवचिव चालूच असते. मध्येच एखाद चिमणा लाडात येऊन प्रणयाराधन करायला बघतो तर लटक्या रागाने चिमणी दूर जाते. मग चिमणा एखादं फूट अलीकडे पलीकडे सरकतो, खालच्या किंवा वरच्या फांदीवर जातो नि काही क्षणातच चिमणी त्याच्या मागोमाग जाते.

प्रणयाचा असा अनुराग, अनुनय, चिवचिवणं म्हणजे जणू काही प्रत:कालीन उषासूक्तच! हा सकाळचा पंधरावीस मिनिटांचा डोळ्यांचा नि कानांचा आनंदोत्सवच!

आणि दोन दिवसांपूर्वी अचानक एक हिरवं गाणं अवतरलं! बाल्कनीच्या बाहेर स्टँडमघ्ये काही कुंड्या ठेवल्या आहेत. गुलाब, मोगरा अशी काही फुलझाडे आहेत. चिमण्यांकडे ओठंगून पाहत असताना कुठून तरी एक हिरवा रावा अचानक आला नि लोखंडी स्टँडवर अलगद् बसला. काहीतरी आल्याचं जाणवलं म्हणून मान वळवून बघितलं तर चक्क एक पोपट तिथे येऊन बसला होता नि ऐटीत मान इकडेतिकडे करीत गोलगोल डोळ्यांनी पाहत होता. क्षणभर माझ्याच नजरेवर माझा विश्वास बसेना. एक निसर्गलेणं माझ्या बाल्कनीत अनाहूतपणे आलं होतं आणि मला काय करावं ते समजेना. मी एकटक नजरेने पाहत होतो. त्याची बाकदार चोच, गोल फिरणारे डोळे, मानेवर लालसर रंगाचा पट्टा नि अंगभर पसरलेलं हिरवेपण! त्याने जागच्याजागी एकदोनदा पाय उचलले, ठेवले, घशातून अनोळखी स्वर काढले. हा नयनोत्सव पाहण्यासाठी मी माझ्या पत्नीला खुणावतोय तोच क्षणात ते चैतन्य उडून गेले! पत्नी येऊन उभी राहिली नि मी तिला, अगदी इथे, आता काही क्षणांपूर्वी पोपट येऊन बसला होता असं अप्रूपतेने सांगितलं. पण तिचा विश्वास बसेना. काही वर्षांपूर्वी माळशेज घाटातल्या पक्ष्यांच्या आत्मघातानं व्याकूळ झालेलं मला तिने पाहिलं होतं. त्यामुळे नादिष्ट्पणाने मला भास झाला असावा असं तिला वाटलं. मारुती चितमपल्ली, लालू दुर्वे यांची पुस्तके वाचतो म्हणूनही असले भास होत असावेत असंही तिला वाटलं. पण माझ्यापुरतं हे सत्य होतं नि राहणार आहे. मनात अनेक महिने रेंगाळणारा लेखातील मोर नि आजचा रावा यांनी माझं स्मृतीभांडार समृद्ध केलंय एवढं मात्र नक्की!

सुरेश देशपांडे/डोंबिवली(प)/ मोबाईल-८३५६०३१७१०/E Mail:scd2000@gmail.com                                               

  

          

Thursday, June 3, 2021

 

बाल्कनी.....!

सध्याच्या स्थानबद्धतेच्या काळात वेळ घालविण्याइतके कठीण काम कोणतेच नसेल.

घरातील अनेक पुस्तके वाचून झाली, काही पुस्तके तर दोनदा वाचली. नव्याने अर्थ समजला, वाचन हे

वेळ घालविण्याचे उत्तम साधन असले तरी सतत काही वाचता येत नाही.बरं टीव्ही तरी किती बघायचा?

आणि का बघायचा? हं, डिस्कवरीवरील बेअर ग्रीलचे अफाट प्रवास किंवा जोशबरोबर केलेली जुन्या गोष्टींचा शोध घेण्यासाठीची धडपड तसेच प्राचीन वस्तू विकत घेणे/विकणे यावरील मालिका, हे असे काही कार्यक्रम मनोरंजन आणि खरंच प्रबोधनही करतात. हे कार्यक्रम मला आवडतात; त्यात काही वेळ जातो पण असं असलं तरी मोकळा वेळ भरपूर असतोच. आता या वेळेचं काय करायचं याचा माझा मलाच लागलेला शोध म्हणजे माझ्या घरातील बाल्कनी! इतके दिवस बाल्कनी म्हणजे सहज काही वेळ उभे राहाण्याची जागा, क्वचित खुर्ची टाकून वाचत बसण्याची जागा इतपत तिचे स्थान! पण या सध्याच्या काळात बाल्कनी हे माझे आवडते ठिकाण झाले आहे.

बाल्कनी अर्थातच सर्वांसारखी लोखंडी जाळी लावून बंद केलेली आहेच. त्यात काही फुलझाडे आणि तुळस वगैरे लावली असून वीस फुटांवर नव्याने झालेली इमारत उभी आहे. या आमच्या दोन इमारतीच्या मध्ये कुंपण भिंत आहे आणि आमच्या इमारतीच्या आवारात असलेली दोन मोठी झाडे, एक उंबराचे आणि दुसरे जांभळाचे, यांचा प्रचंड विस्तार दोन्ही इमारतींना लगटून झाला आहे. काही फांद्या तर लोखंडी जाळ्यांच्या इतक्या जवळ आहेत की हात लांब करून सहज पाने तोडता येतील!

माझ्या बाल्कनीत बसून या झाडांचे आणि झाडांवरील पक्षी पाहाणे हा माझा अलीकडील जडलेला छंद, मला किती आनंद देतो हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच!

माझ्या एक लक्षात आले की या झाडांवर अनेक पक्षी येतात, कावळे, चिमण्या (या आता संख्येने कमी झाल्यात)या पक्ष्यांबरोबरच साळुंक्या, कबुतरे असे नेहेमीचे दिसणारे पक्षी दिवसभर वास्तव्य करून असतात. आणखी निरीक्षणास आलेली गोष्ट म्हणजे आपली खारुताई! दोन खारुताई आहेत. झुबकेदार शेपटीचा गोंडा, घोंगडीच्या रंगाच्या पाठीवर रामाच्या बोटांच्या तीन पांढऱ्या रेषा आणि सतत तुरुतुरु धावपळ, बरं, या दोघीही एकमेकीच्या पाठोपाठ! गंमत म्हणजे सकाळ झाली की या समोरच्या फांद्यांवर हजर! दोघींपैकी कोणीही आधी आलं तर दुसरीकरता आपल्या ठरावीक आवाजात आवाज काढणे सुरु... दुसरी खार  येईपर्यंत पहिलीचा आवाज सुरु असतो. तोही अगदी मोठ्याने, प्रत्येक आवाजाबरोबर तिची शेपटी खालीवर होत असते. हे मात्र माझं खास निरीक्षण! प्रत्येक पक्षी आपल्या तोंडातून आवाज काढताना आपली शेपटी वर उचलतो. मग तो कावळा असो किंवा साळुंकी.

या खारी फांद्यांच्या मुळाशी किंवा जर दोन फांद्या निराळ्या दिशेने जात असतील तर त्यांच्या सांध्यापाशी आपली चोची रुतवून त्यातला गर खायचा प्रयत्न करतात. कितीतरी वेळ चोची त्यात खुपसून त्या काय करतात कोणास ठाऊक? मध्येच त्या चोची बाहेर काढून पुन्हा त्यांची धावपळ सुरु होते. दिवसभर त्यांचा हाच खेळ असतो. मध्येच एखादी खारुताई आपल्या मागच्या दोन पायावर उभी राहून पुढच्या दोन हातांनी(!) आपले पोट खाजवत बसते, त्यावेळचे तिचे दिसणे खूपच विलोभनीय असते. 

साळुंक्या जिथे बसतील तिथून त्यांचा प्रचंड कलकलाट चालू असतो. आपल्या तीव्र आवाजात त्या इतक्या कचकचाट करीत असतात की ‘साळकायामाळकाया’ भांडत आहेत असेच वाटते. त्यांची ही भांडाभांडी जागेच्या मालकीवरून सुरु असते असे म्हणतात.

अलीकडेच एक छोटा पण अतिशय स्मार्ट पक्षी यायला लागलाय. तळहाताएवढा असलेला हा पक्षी आपल्या खणखणीत आवाजात बोलतो. ओरडताना त्याचीही शेपटी उभी राहते, पक्षीतज्ज्ञ असलेल्या माझ्या मित्राला, प्रल्हादला विचारले तर तो म्हणाला हा पक्षी म्हणजे शिंपी पक्षी. खूप धीट असला तरी खूप चंचल आहे, क्षणक्षणाला तो आपली जागा बदलतो, पानांआड दडून बसतो आणि सतत आपल्या तीक्ष्ण आवाजात बोलत असतो. या पक्षाच्या आवाजाला नेमके काय नाव द्यावे कळत नाही. आणखीन दोन प्रकारचे पक्षी दिसतात पण त्यांची नावे माहीत नाहीत, दोन्ही पक्षी खूपच चपळ आणि चंचल आहेत.  

कावळ्यांकडे बघताना एक लक्षात आले की या कावळ्यांचा आकार मोठा आहे! पुन्हा माझ्या मित्राला विचारले तर तो म्हणाला, एरवी शहरापासून दूर रेतीबंदरच्या आसपास राहणारे डोमकावळे आता शहरी वस्तीत खाण्यासाठी यायला लागले आहेत. यातला एक कावळा  आपल्या धारदार चोचीने दोन फांद्यांच्या मधल्या गोल भागाला सपाट करण्याच्या प्रयत्न करत होता. त्या जागेवर येताना लहान लहान काड्या, सुतळ, प्लास्टिकचे तुकडे आणून पावसाळ्यापूर्वी तो घरटे करण्याच्या प्रयत्नात आहे. मध्येच तो चारही दिशेला मान वळवून कावकाव करत इतर कावळ्यांना मदतीला या असे बोलावतो,पण कोणीही येत नाही!

मित्र म्हणाला जर घरटे झाडाच्या शेंड्यापासून खूप खाली असेल तर पाऊस भरपूर येणार आणि जर शेंड्याजवळ असेल तर पाऊस कमी पडणार, पक्ष्यांना हे बरोबर कळते!

कबुतर हा मात्र मला अतिशय निर्बुद्ध पक्षी वाटतो. झाडांवरून लोखंडी जाळीवर आणि पुन्हा फांदी अशाच दिवसभर त्यांच्या फेऱ्या सुरु असतात. बसतील तिथे घाण करतात आणि घशातून घूत्कार काढत घुमत असतात. आपले गोल आणि रंगीत डोळे फिरवीत नि मान हलवत ही कबुतरे कुठे आणि काय बघत असतात कोण जाणे!

मध्यंतरी वादळ झाले, उंबर आणि जांभूळ दोन्ही झाडे खूपच जोराने हलत होती, काही वेळा तर असे वाटले आता कोणत्याही क्षणी ती पडतील पण अजून टिकून आहेत! या झाडांच्या फांद्या जेंव्हा वरखाली होत असत तेंव्हा काही धीटुकले पक्षी त्या फांद्यांवरून वरखाली, मजेत झुलत होते. या सर्व  पक्ष्यांच्या जोडीने मधूनच लोखंडी जाळीतून आतबाहेर करणारी संख्येने फार नाही पण दोन तीन फुलपाखरेदेखील माझ्या आनंदात भर घालतात.    

पक्षी निरीक्षणाचा हा छंद मला दिवसभर व्यस्त ठेवतो. तासनतास बघत बसलो तरी कंटाळा येत नाही, माझ्याच घरातील एका सुंदर जागेचा शोध जसा लागला तसेच सलीम अली किंवा आपले मारोतराव चितमपल्ली आपले आयुष्य या पक्ष्यांच्या सान्निध्यात कसे काय काढू शकले याचे आता आश्चर्य वाटेनासे  झाले आहे; त्यातला अनोखा आनंद आता मलादेखील समजू, कळू आणि मिळू लागला आहे! निसर्गात किती प्रकारचे वैविध्य आहे, सर्वच पक्षी कसे खेळीमेळीने एकमेकाच्या सहवासात रमले आहेत, आणि झाडं! तीही सजीवच असतात ना! आपल्या अंगाखांद्यावर या सर्व पक्ष्यांना वावरू देतात, त्यांना अन्न देतात नि निवाराही! अशा प्रकारचे सहजीवन पुस्तकात वाचून माहीत होते पण आता प्रत्यक्ष पाहतांना,माझे जीवनदेखील समृद्ध होत जाते हा शोध ही या काळाची मला मिळालेली देणगी आहे. संकटातही संधी शोधता येते, हाही एक शोधच!   

सुरेश देशपांडे, बी १२, आसावरी सोसायटी, गुप्ते रस्ता, डोंबिवली (प) ४२१२०२

E mail:scd2000@gmail.com / Mobile 8356031710                               

          

                      

Friday, January 22, 2021

 

अकल्पित लाभ.....!

बऱ्याच दिवसांपासून, मुतालिक दाम्पत्याला भेटायला जायचे असे ठरविले होते. खरे तर मागच्या फेब्रुवारीतच जायचं होतं; पण ......या ‘पण’ने अनेकांची गणिते चुकविली. कोरोनाने सगळ्यांनाच स्थानबद्ध केले. आता वातावरण बऱ्यापैकी मोकळे झाल्यामुळे घराबाहेर पडता येऊ लागले, थोड्या फार प्रमाणात एकमेकाच्या घरी जाता येऊ लागल्यावर, संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच १४ जानेवारीला मुतालीकांना फोन करून त्यांच्या घरी भेटायला गेलो.

कधीकधी एखादा दिवस अचानकपणे काहीतरी छान असे देऊन जातो; तसंच झालं.

अलकाताई मुतालिक भागवतावर अतिशय सुंदर भाष्य करतात, प्रवचने, सप्ताह करतात हे माहीत होते. त्यांची भाषणे ऐकण्याचाही योग आला होता. कोरोनाच्याच काळात, मंथन व्यासपीठावर ‘राधा’ या विषयावर त्यांनी केलेले भाषण अजूनही लक्षात आहे. ‘राधा’ या शब्दाला किती अर्थ आहेत, कृष्णाच्या राधेचे वेगळेपण काय आणि रासक्रीडेतील राधा कशी निराळी होती असे अतिशय सुंदर, ऐकत राहावे असं निरुपण त्यांनी केले होते. अलकाताईंचा आध्यात्मिक क्षेत्रातील अभ्यासही खूप आहे, हेही माहीत होतं.

दत्तात्रय मुतालिक हे अजूनही रोज चरख्यावर सूत काततात हेही ऐकले होते आणि मला त्याचेच जास्त कुतूहल होते. त्याविषयी जाणून घ्यायचे होते. पण त्यांच्याकडे गेल्यावर मला बरेच काही ऐकायला आणि पाहायला मिळाले.

“वर्ध्याला माझी आणि ठाकूरदास बंग (डॉ. अभय बंग यांचे वडील) यांची भेट झाली आणि मी जरी आधीपासून गांधींना मानणारा असलो तरी सूतकताईची प्रेरणा मात्र त्यांच्याकडून घेतली” दत्तात्रय तथा बाबा मुतालिक सांगत होते. मग मुंबईला आल्यावर चरखा कुठे मिळतो अशी चौकशी करून त्यांनी खादी ग्रामोद्योग भांडारच्या माध्यमातून यांत्रिक चरखा मिळविला. आता त्याला लागणारा पेळूचा कापूस किंवा ज्याला स्पिंडल म्हणतात ते कापूस गुंडाळलेली फिरकी म्हणू या कुठे मिळतो, तो चरखा कसा वापरायचा, तयार झालेल्या धाग्याचे काय करायचे ही सगळी माहिती बाबा एखाद्या लहान मुलाच्या उत्साहाने सांगत होते. त्यांनी तयार सुताच्या लड्याही दाखविल्या आणि अनिरुद्ध बापूंच्या माध्यमातून त्या लड्या कशा गोळा केल्या जातात याचे बारीकसारीक तपशीलासह वर्णन केले. हे सर्व ऐकून मी खरे तर केवळ आश्चर्यचकितच नव्हे तर भारावून गेलो होतो. बाबा मुतालिक एवढेच करीत नाहीत तर त्यांनी आतल्या त्यांच्या पुस्तकांच्या मांडणीतून त्यांनी मोठ्या आकाराच्या बऱ्याच वह्या आणल्या. सुंदर हस्ताक्षरात, एकटाकी लिहिलेल्या वह्या मी उघडून बघितल्या.

१०५०० पेक्षा जास्त ॠचा असलेल्या ‘ॠग्वेद’ या, वेदमूर्ती डॉ.भीमराव कुलकर्णी यांनी (सार्थ) लिहिलेल्या, छापलेल्या प्रचंड ग्रंथातील सर्व मजकूर, बाबांनी हाताने लिहिला होता. १००० पेक्षा, मोठ्या आकारातील जास्त पृष्ठे हाताने लिहिणे यासाठी खूपच मोठा निग्रह लागतो. बरे लिहिताना कमालीचा व्यवस्थितपणा, प्रारंभ तारीख, स्कंद, मंडल

ॠचा संख्या, एकूण एक तपशील सुवाच्य अक्षरात, सुरुवातीच्या पानात नोंदलेला!आणि केवळ नुसताच ॠग्वेद नव्हे तर अन्य अनेक ग्रंथ त्यांनी हाताने नकलून काढले आहेत. बाबांचे पुस्तकाचे कपाट त्या हस्तलिखितांनी भरून गेले आहे. (माझे दुसरे एक स्नेही श्री प्रफुल्लचंद्र पाटील हेही अशाच प्रकारे,तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी आपल्या अप्रतिम अक्षरात अंकित करीत असतात)

वाचता येणारे ग्रंथ हाताने लिहिताना निराळाच अर्थ प्रतीत होतो असे प्रफुल्लचंद्र पाटील म्हणतात तेच बाबांनी सांगितले. या प्रचंड वेळकाढू कामासाठी सातत्य आणि मनोनिग्रह लागतो. सूतकताई आणि लिहिणे यातून तो मला जाणवला होताच. वास्तविक बाबा मुतालिक व्यवसायाने अभियंता, अभियांत्रिकी क्षेत्र हे त्यांचे कार्यक्षेत्र पण तरीही बाबा या विषयातदेखील रममाण होतात.

अलकाताईंकडे तर कितीतरी सांगण्यासारखे होते आणि आहे. वयाच्या १६ व्या वर्षी विवाह झाल्यावर त्यांनी विवाहानंतर बाबांच्या प्रोत्साहनामुळे आपले शिक्षण पूर्ण केले. विजापूरजवळील निंबाळ येथे गुरूदेव रानडे यांचा मठ आहे. त्यानेहेमीच तेथे जातात. डॉ.श्रीकृष्ण देशमुख हे त्यांचे अध्यात्मातील गुरू. त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी वाटचाल केली आहेत. भारतातील अनेक ठिकाणी तसेच परदेशातही त्यांनी भागवतावर प्रवचने केली आहेत. माहितीचा आणि ज्ञानाचा खजिनाच त्यांनी बोलताबोलता माझ्यापुढे उलगडला. महर्षी वेदव्यासांनी

पैल(ॠग्वेद),सुमन्तु(अथर्ववेद),वैशंपायन(यजुर्वेद),जैमिनी(सामवेद) (यजुर्वेदाचे दोन भाग) असे आपल्या शिष्यांना चारही वेद कसे वाटून दिले, एवढेच नव्हे वेदग्रंथातील कांड, मंडल, मंत्रांची संख्या, दहा उपनिषदे  तर तैतरीय उपनिषदात भाषा, लिपी यासंबंधी ‘शिक्षावल्ली’ हा भाग आहे, शंकराचार्यांनी चारही मठांची कशी स्थापना केली      हे सर्व अलकाताईंनी अतिशय रसाळ शब्दात वर्णन केले. ओघवती भाषा, विषय सोपा करण्याची हातोटी, श्रोत्यांशी सहज संवाद साधण्याची कला, फाफटपसारा नाही, पोकळ शब्दांचा फुलोरा नाही, काही अवैज्ञानिक किंवा बुवाबाजी, थोतांड काहीही नाही, शुद्ध आध्यात्मिक आणि सात्विक प्रवचन! त्यांच्याकडील वेद,महाभारत,भागवत  आदी ग्रंथवैभव पाहून माझे मन निवले......!  

अलकाताई आणि बाबा मुतालिक यांच्याशी गप्पा मारताना दोन तास कसे पसार झाले हे कळलेच नाही,,त्यांनी दिलेल्या फराळाचा आस्वाद घेऊन मी तिथून निघालो.          

निघताना माझ्या मनात त्यांचे एक वाक्य घोळत होते. मुतालिक दाम्पत्य त्याच दिवशी संध्याकाळी, वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी यांना भेटायला जाणार होते. “तुम्हीही या” असं त्यांनो सहज म्हणून मला सांगितले होते.

डॉ.भीमराव कुलकर्णी यांचे नाव मी ऐकून होतो. चारही वेदांचे अनुवाद त्यांनी अत्यंत सोप्या आणि सामान्य माणसालादेखील समजेल अशा भाषेत लिहिलेले मला ठाऊक होते.त्यातील ॠग्वेद आणि यजुर्वेद प्रकाशित झाले आहेत.  सामवेद आणि यजुर्वेद प्रकाशित होत आहेत,त्यांचे वय ९८ आहे याची मला कल्पना  होती आणि त्याही वयात ते सामवेदावर काम करीत आहेत, तोही ग्रंथ १००० पृष्ठांवर जाणार आहे. वेदांवर विपुल साहित्य निर्माण करणारे डॉ. भीमराव कुलकर्णी, जी.एस.मेडिकल कॉलेजमध्ये अध्यापन करीत होते, ते इलेक्ट्रोनिक इंजिनिअर झाले, अनेक विषयात त्यांना गती आहे, स्वत:चा मोबाईल आणि टीव्ही ते स्वत: दुरुस्त करतात, याही वयात ते केवळ माहिती मिळविण्यासाठी बाईकवरून किंवा चारचाकीतून दोन दोन हजार मैलाचा प्रवास करतात, हे सर्व ऐकून त्यांना भेटण्याविषयी मी खूपच उत्सुक होतो. आणि मुतालिकांनी ‘तुम्हीही या’ असं म्हटल्यावर मी न जाणे शक्यच नव्हते.

संध्याकाळी डॉ.भीमराव यांच्या घरी पोहोचलो तर सौ. व श्री मुतालिक आलेच होते. डॉ. भीमराव यांचे ॠषीतुल्य

दर्शन होताच मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि अगदी सहज त्यांच्याशी संवाद साधत गेलो. आधी मनात  त्यांच्या मोठेपणाविषयीची आदरयुक्त भीती होती, ती त्यांच्या दर्शनाने नाहीशी झाली. बोलण्याच्या ओघात

डॉ.भीमराव कुलकर्णी यांनी किती विषय हाताळावेत?

गायत्री मंत्राचा अर्थ समजावून सांगताना, गायत्री मंत्रात सूर्यकिरणातील अवरक्त(इन्फ्रारेड), क्ष-किरण, अल्ट्रा व्हायोलेट किरण यासंबंधीचा उल्लेख कसा आहे येथपासून ते सूर्यावर दर अकरा वर्षांनी पडणाऱ्या काळ्या डागांची नावे ॠग्वेदात आहेत हे सांगताना त्यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहिलेल्या मंत्राच्या जोड्या दाखविल्या.(रुद्राचा संबंध), ॠग्वेदाचा काळ हा इसवीसनापूर्वी ३७००० वर्षे इतका आहे अशी शासकीय नोंद आहे, तसेच वेदांना अपौरुषेय का म्हणतात हेही त्यांनी विस्ताराने सांगितले. ॠषींना अवकाशातून आलेल्या ध्वनींतून वेदांचे ज्ञान झाले आणि नंतर ३३० ॠषींनी त्या ॠग्वेदाला अक्षरांकित केले, यात काही स्त्री वेदज्ञांचा सहभाग असून,२४९ ॠषी हे आजच्या ‘ब्राह्मण’ या व्याख्येत न बसणारे होते ही माहिती सांगितली. ॠग्वेदातील यांत्रिक माहितीचाही त्यांनी उल्लेख केला.

तासभर चाललेल्या या भेटीत डॉ.भीमराव उर्फ नाना इतकं काही बोलत होते की किती लक्षात ठेवू आणि किती नाही हे कळत नव्हते. अखंड वाहणाऱ्या प्रवाहात मी न्हात होतो आणि ऐकताना देहावर काटा येत होता!

९८ वर्षाचे ॠषीतुल्य डॉ.भीमराव एकटेच राहतात.ज्ञानलालसेने अविरत अभ्यास, संशोधन करणारे डॉ भीमराव यांना आपल्या विश्वात रममाण झाले आहेत. मला वाटते आज त्यांच्या इतक्या तोडीचे ज्ञानमहर्षी भारतात फारच थोडे असावेत. भारत सरकारने याची नोंद घेऊन संस्कृत दिनी या ज्ञानवंतांचा सन्मान व्हावा    

सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे एखादा दिवस असे काही अनोखे दान देऊन जातो की त्याचे विस्मरण होणे शक्य नाही!

 सुरेश देशपांडे/आसावरी,गुप्ते रस्ता,डोंबिवली(प)४२१२०२