Saturday, April 11, 2020

गंगा
----
दूरदर्शनवर गंगा नदीविषयीचा माहितीपट नुकताच बघितला. काही दिवसांपूर्वी डिस्कव्हरी वाहिनीवरदेखील अतिशय सुरेख असा माहितीपट पाह्यला होता.
त्या माहितीपटात काही परदेशी पर्यटक/अभ्यासक काशीहून प्रयागराजपर्यंत (अ्लाहाबाद) गंगा नदीतून प्रवास करत आले होते. त्यापूर्वी गंगा नदी, जी हिमालयातून प्रवाहित होत येते, प्रचंड खडक, मोठमोठे शिलाप्रस्तर यातून प्रवास करणारी गंगा प्रचंड वेगाने वाहत येते. बाजूला घनगर्द जंगल, उंच वृक्षांची दाटी आणि त्यात मध्येच एका निर्जन ठिकाणी एका साधूची मठी. या साधूने मागील अनेक वर्षात, वेगवेगळ्या वेळी काढलेले गंगा नदीचे फोटो आणि त्याचे संग्रह त्याच्या मठीत हरीने लावून ठेवले होते.
हे सर्व सांगण्याचा उद्देश असा की मला फार पूर्वीपासून गंगा नदीविषयी एक अनामिक कुतूहल वाटत आले आहे. एक प्रकारची ओढच म्हणा ना!
महाभारतातील कुरुवंशीय राजा भगीरथ याने अथक प्रयत्न करून या जीवनदायिनीला हिमालयातून जमिनीवर आणले. या नदीच्या सहाय्याने अनेक संस्कृती इथे बहरल्या, अनेक पिढयांचे जीवन फुलले, आपल्या देशाला सुजलाम सुफलाम केले, त्यामुळे आपल्या हिंदू आणि भारतीय संस्कृतीत गंगा नदीला असलेले अनन्यसाधारण महत्त्व!
मोक्षदायिनी गंगा, तापहरिणी गंगा, पापक्षालिनी गंगा शीतल जलवाहिनी गंगा, कुठे तिचे तिचे अतिशय सुंदर, रम्य शामल रूप तर कुठे तिचे रौद्र दर्शन! हरिद्वारला भेटणारी गंगा इतक्या वेगात वाहते की मोठमोठे दगडदेखील सहज वाहून जातात, प्रयागराजला यमुनेला गळामिठी घालणारी
गंगा एखाद्या ज्येष्ठ प्रेमळ बहिणीसारखी वाटते, कोलकत्त्याला तिचे पत्र एवढे विशाल आहे की महाक्य जहाजे त्यातून सहज प्रवास करतात.
गंगेविषयीच्या अनेक आख्यायिका, दंतकथा ऐकल्यामुळे मूळच्या कुतूहलात
भरच पडत गेली, ओढ वाढत गेली, गंगेच्या दर्शनाची उत्सुकता अस्वस्थ करत होती.
तसे तर १९७८ साली ऐन थंडीच्या दिवसात हरिद्वारला जाण्याचा योग आला होता, त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी, लक्ष लक्ष दिवे गंगेच्या प्रवाहात सोडले जात असताना, त्या थंडगार जलाचा चटका बसत असताना डोळे, नाक बंद करून डुबकी मारून मोक्षप्राप्तीचे पुण्य गाठी बांधले होतेच. पण त्याला आता ४० वर्षे उलटून गेली होती!
त्यामुळे कुठे गंगा, कुठे भागीरथी, कुठे जान्हवी, मंदाकिनी, अलकनंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगेच्या दर्शनाची आस मनात दाटत होती.
अर्थात त्यालाही एक भावनिक कारण होतेच!
माझे वडील, चिंतामणबुवा शिरवळकर कीर्तनकार होते. जवळपास पन्नास वर्षे त्यांनी कीर्तने केली. आपल्या कीर्तनात ते पंडितराज जगन्नाथ यांचे आख्यान लावीत असत. सलग आठ दिवस चालणाऱ्या या प्रासादिक चरित्रात पंडित जगन्नाथ यांच्या आयुष्याचा पट उलगडून दाखविला जात असे.
आंध्र प्रदेशातील एक लहानशा खेड्यात जन्मलेले जगन्नाथ पंडित दिल्लीच्या अकबर राजाच्या दरबारात नवरत्नांपैकी एक म्हणून गौरविले जातात. तिथे
अकबर आणि जोधाबाई यांची कन्या लवंगी त्यांच्या विद्वत्तेच्या आणि काव्याच्या प्रेमात पडते. त्यांचा विवाह होतो, पण हा विवाह कोणालाच मान्य नसतो आणि मग हे दोघेही अत्यंत पश्चात्तापदग्ध अंत:करणाने काशीला
गंगेच्या काठावर दशाश्वमेध घाटावर येतात. घाटाच्या सर्वात वरच्या पायरीवर उभे राहून जगन्नाथ पंडित अत्यंत आर्त भावनेने, अंत:करणातील करूण भावाने गंगेची स्तुती करायला सुरुवात करतात.(ते स्तोत्र म्हणजे गंगालहरी) आणि प्रत्येक श्लोकाबरोबर गंगा नदीचे पाणी एकेक पायरी वर येते आणि ५१ व्या श्लोक संपतो त्यावेळेस गंगा या दिघांना आपल्या प्रवाहात सामील करून घेते! असा हा सगळा चरित्र भाग माझ्या वडिलांच्या कीर्तनात मी जेंव्हा तबल्याला साथ करत असताना अनेक वेळा ऐकला होता. नि त्यामुळेही गंगेच्या दर्शनाची आस माझ्या मनात खूप आधीपासून होती.
तो योग तीन वर्षांपूर्वी आला!उत्तर भारतात सहलीला गेलो असताना
काशीविश्वेश्वराच्या दर्शनापेक्षा दशाश्वघाटावर उभे राहून गंगेचे डोळे भरून घेतलेले दर्शन हा चिरस्मरणीय क्षण होता! अनेक वर्षे मनाच्या तळाशी जपून ठेवलेले स्वप्न साकारले होते! माझे डोळे नकळत भरून आले, अनेक क्षण मी मूकपणे बसून होतो! मनाला शांत शांत वाटले ! मग उठून गंगेच्या आरती ला भक्तीभावाने हात जोडून उभा राहिलो. पुढे प्रयागलाही हीच गंगा पुन्हा भेटली! खूप कृतार्थ वाटले.
मागच्या वर्षी असाच पुन्हा योग आला!
आधी कानपूरला गेलो. तिथले बिर्लांचे कृष्ण मंदिर, सुधांशू महाराजांच्या आश्रमातील रामायण महाभारतातील देखावे, नानासाहेब पेशवे, टोपे यांचे संग्रहालय, कारगिल स्मारक यानंतर तिथेही गंगा भेटलीच! मग पुन्हा काशी,
प्रयाग!
अशी ही सर्वव्यापिनी गंगा, सतत मनात वाहणारी!
कालच्या दूरदर्शनवरच्या गंगेवरच्या माहितीपटाने या सर्व आठवणी मनात जागविल्या!
नाही तरी रोज स्नान करताना आपण गंगा सरस्वती या पवित्र नद्यांचे स्मरण करतोच ना!
सुरेश देशपांडे

No comments:

Post a Comment